मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

पुणेयाहून कांही इंग्रज यांची रवानगी लष्करात जाहाली असे बोलतात. होळकर याची फौज तापी नदी उतरली, श्रीमंताची स्वारी नाशिकास जाणार, तेथे ते येऊन मिळणार, असेंहि लोक बोलतात. इंग्रज याची पलटणें हिंदुस्थानात होती ती पांच मेली, कां तरी जरीमरी येऊन मेली, असें लोक बोलतात. नबाबाकडील फौज दहा हजार व पलटणें सुमारे दोन येऊन अठा चो दिवशी सरकारचे फौजेस मिळणार असेंहि बोलतात. सायंकाळ जाहला. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहली. मित्ती शु॥ ११ भृगुवार + + + श्रीमंताची स्वारी जुनरास गेली. बापू गोखले याचा मुक्काम नारायणगावास आहे, फिरंगी घोडनदीवर आला, मागे फौज पुरंदरे, आपटे व विंचुळकर आहेत, असें ह्मणतात. दुसरें वर्तमान फिरंगी यांची रसद गेली होती ती आपटे यांचे फौजेने वाघोलीचे मैदानांत लुटली, कांही बैल अजमासें चार पाचशें नेले आणि बाकी माघारे आले. असेंहि बोलतात. कोणी ह्मणते की खासा इंग्रज अल्पिष्टिन साहेब पुणें मुक्कामी येणार, असेंहि बोलतात. गंगाधर शास्त्री याचा लेक लोहगडेचे वाटेने येत होता तेथे लोहगडकरी याणी तोफा मारल्या, तेथें कांही इंग्रज याची नासाडी जाहली असेंहि बोलतात. होळकराकडील वकील खंडोपंत बाबा यांसी थोरले वाडयात बलावून आणिले होते, तेथें साहेब याणें सांगितलें की तुचें पत्र येतें की नाही. ते वेळेस वकील याणीं उत्तर केलें की, साहेब, होळकरी डाक चलती नहीं, फेर वर्तमान कैसा आयेगा. तेव्हां तेणें सांगितलें की तुह्मी आपली डाक बसवा आणि रोज दरबारास येत जा. ते वेळेस याची वर्दी आली होती ती पुढें ठेविली. त्यांत मजकूर होता कीं आह्मी नर्मदा उतरलो, मार्गशीर्षी पौर्णिमेचे सुमारास येऊन मिळतो, तुह्मी चिंता करूं नये. ऐशी वर्दी पाहून बहुत येथील साहेब याचा संताप जाहाला. वकिलास काय करतो ? असा सायंकाळ जाहला. शिरस्तेप्रमाणे तोफ जहाली. मित्ती शु॥ १२ मंदवारचें वर्तमान तळेगावावर स्वारी आली ते वेळेस निपाणीकर अडला की मला पुण्याकडे जाण्याचा हुकूम द्यावा, मी आणि पुणें जसे घडणें तसें घडेल. श्रीमंतांनी उत्तर केलें की हें ठीक नाही, माझी आणि त्रिंबकजीची गांठ एका दोदिवशी पडावयाची आहे, ती पडली ह्मणजे तुह्मास निरोप देईन. तो ऐकेना. तेव्हां मागील दीड प्रहर रात्र अष्टमीचे दिवशी राहिली. ते वेळेस होळकराकडील डाक आली की स्वारी जलद कोपरगावास यावी, आह्मी येतों आणि गुरुपुष्यावर भेट व्हावी. अशी आली की निपाणकर यांस दाखविली. तेव्हां तो स्वस्थ जाहाला. नाहीतरी पुणें लुटावें की जाळावें असा मनसबा निपाणकर याचा होता. परंतु दैवयोगें राहिला असें लोक बोलतात. कोणी ह्मणते इंग्रज फार बेजार आहे. घोडनदीवरून नगरास जाणार आणि तेथें बळकावून राहणार. असेंहि बोलतात. याप्रमाणें सायंकाळपर्यंत वर्तमान जाहालें. रात्र जाहाली. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. मि॥ शु॥ १३ रविवारचे वर्तमान. शहरात सावकारा फार गडबडला. आपली कुटुंबे काढू लागले. कोणी ह्मणत कीं इंग्रज याणें ताकीद केली की आमचे भरंवशावर राहू नये, तुह्मास कळेल तसें करावे. असेंहि बोलतात. कोणी ह्मणतात की आज स्वारीचा मुकाम बादुरास आहे. असेंहि बोलतात. कोणी ह्मणते की त्रिंबकजी भिल्लासुध्दां येऊन भेटला. त्याचे भिल्ल सुमारी ७००० आहेत. कोणी ह्मणते की भोसले यांणी लढाई चांगली मारली, फिरंगी फार शिकस्त जाहाला. कोणी ह्मणते की होळकर याची भेट गुरुपुष्यावर निखालस होणार. सारांश फिरंगी (पळाला) असेंहि बोलतात. सायंकाळ जाहाला. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. मित्ती शु॥ १४ सोमवारचें वर्तमान. भोसले याजकडील फौज पाच सात हजार व हत्ती बाणांनी भरून सुमारी २०० व उंटे पाचशें व बाण लावणारी माणसें सुमारे ५०, ते पालखीपदस्त आहेत, असे येऊन श्रीमंतासी मिळाले, असे लोक बोलतात. पुणे बाहेरी धमधमे बांधतो आहे असेंहि बोलतात. इंग्रज घोडनदीवर आहे, गोखले वगैरे तेच तोंडावर आहेत, सल्ल्याचे बोलणे इंग्रज यांणीं घातले आहें, असेंहि बोलतात. अशी सायंकाळ जाहाली. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. मित्ती शु॥ १५ मंगळवार वर्तमान. थोरले वाडयांत साहेब पुणें मुकामीं आहेत ते एके ठिकाणी मिळून कोशल मांडिले आहे. त्यांस वर्तमान असें आलें की सरकारचे आरब सुमारी ५००० हजार शहरांत येणार आणि रस्ते बंद करणार. पुढें कसें करावें ही मसलत येऊन पडली आहे असेंहि लोक बोलतात. इंग्रजाचे लष्करात फार कोशल, फार खराबी आहे, बापू गोखले थुगावास आहेत, श्रीमंत नाशकास आहेत, असेंहि बोलतात. सुरापूरचे बेरडाची फौज तीन हजार व पायदळ एक हजार आहे, आवशी गोखले याचे फौजेत येतें, असें ह्मणतात. इंग्रज यांची पलटणें करनाटकांतून आकळोजेस आली. दोन हजार लोक आहेत असेंहि बोलतात. याप्रमाणें सायंकाळ जाहाला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries