संस्कृत भाषेचा उलगडा

तक्त्यातील पाचव्या कंसात रै व गौ हे शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी सारखेच चालतात. म्हणजे यांना स्त्रीलिंगी व पुल्लिंगी सारखेच प्रत्यय लागतात याचा अर्थ असा की, विभक्तिप्रत्ययावरून लिंग दाखविण्याची युक्ति निघण्यापूर्वीचे हे रै व गौ शब्द आहेत. गा:, गौ:, गवा या रूपांवरून बैल विवक्षित आहेत की गाई विवक्षित आहेत ते सांगता येत नाही, त्यांच्या पाठीमागे इमा:, एव: इत्यादी विशेषणे जेव्हा लावावी तेव्हा स्त्री की पुरुष हे ज्ञान होते. हलन्त स्त्री किंवा पुं शब्दांना ज्याप्रमाणे सारखेच विभक्तिप्रत्यय लागतात त्याचप्रमाणे रै व गो या शब्दांना दोन्ही लिगी एकच विभक्तिप्रत्यय लागतात. दुसऱ्या रीतीने बोलावयाचे म्हणजे रै व गौ शब्द जेव्हा प्रचलित झाले तेव्हा पूर्ववैदिकसमाजात लिंगदर्शक निराळे विभक्तिप्रत्यय नव्हते. गो हा शब्द प्रचारात फार असल्यामुळे त्याची जुनाट रूपे जशीची तशीच पाणिनीपर्यंत पोहोचली. पाचव्या कंसांतील पुल्लिंगी ग्लौ शब्द व स्त्रीलिंगी नौ शब्द हे शब्दही गो शब्दाइतके च जुनें असून यांना सारखेच विभक्तिप्रत्यय लागतात. अत्यंत पुरातनकाली आर्यंभाषात लिंगभेददर्शक विभक्तिप्रत्यय नव्हते हे उघड आहे. चवथ्या कंसात पितृ व मातृ हे जुनाट शब्द आहेत, पितृ पुं वाचक आहे व मातृ स्त्री वाचक आहे, असे वैदिककाली मानीत व पाणिनीयकाली मानीत, परंतु पूर्ववैदिककालच्या अत्यंत जुनाट थरात हे दोन्ही शब्द स्त्री पुंभेदवाचक नव्हते. कारण या दोन्ही शब्दांना एकच विभक्तिप्रत्यय, हे प्रत्यय अस्तित्वात आल्यावर लागू लागले. पाणिनीय व छांदसभाषेत पितृ व मातृ यांच्या रूपात एका स्थली मात्र भेद आहे. ते स्थल द्वितीयात्रिवचन हे होय, पितृन् व मातृ: अशी भिन्न रूपे पाणिनी देतो. परंतु एकेकाळी पितृन् व मातृन् अशी सारखीच रूपे होती याला ज्ञापक आहे. मातृ शब्दाचे षष्ठीचे अनेकवचन मातृणाम् असे पाणिनीयभाषेत होते. प्रथमेच्या अनेकवचनी मातृ शब्दाची रूपे मातृँ: मातृन् असल्याशिवाय, मातृणाम् हे रूप सिद्ध व्हावयाचे नाही अशी अपरिहार्यता असल्यामुळे, पितृन्प्रमाणे मातृन् असे द्वितीयाअनेकवचनी रूप जुनाटकाळी होते हे स्पष्ट आहे. तात्पर्य, जुनाटकाळी पितृ व मातृ या शब्दांना एकच प्रत्यय लागत. पुढे कालान्तराने वैदिकभाषा अस्तित्वात येत असताना विभक्तिप्रत्ययानी भेद दर्शविण्याकडे लक्ष जाऊ लागले व  पितृन रूपापासून मातृ: रूप विभेदू लागले. मातृ: रूपाच्या अंती जो विसर्जनीय आहे तो जात्या स्त्री प्रत्यय नाही. तो प्रत्यय स्त्री शब्दांना जसा लागतो तसाच पुंशब्दांनाही लागतो तेव्हा मातृशब्दाचे द्वितीयानेकवचन मातृ: करून लिंगभेद दाखविण्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट आहे, फक्त भेद दाखविण्याची बुद्धी होती. रै, गो, द्यो ग्लौ, नौ इत्यादी शब्दांच्या द्वितीयानेकवचनी ही भेदबुद्धी मुळीच नव्हती. या ऋकारान्त पितृमातृशब्दांच्या द्वितीयानेकवचनातच प्रथमत: ती अनुभवास येते. कालान्तराने ही भेदबुद्धीक इतकी एकपक्षी झाली की, पाणिनीकाली स्त्रींलिंगी शब्द म्हटला की त्याचे द्वितीयानेकवचन नन्त कधीच नसावयाचे, सदा विसर्जनीयान्त असावयाचे. बाकी न् चा किंवा विसर्जनीयाचा लिंगाशी काहीएक संबंध नाही हे रूपसाधनिकेवरून सहज लक्षात येण्यासारखे आहे. पितृ व मातृ या ऋकारान्त शब्दांच्या एका रूपात फक्त भेदबुद्धीचा आभास मात्र झाला. खरी लिंगभेदबुद्धी आकारान्त, इकारान्त, उकारान्त, ईकारान्त व ऊकारान्त शब्दांच्या चतुर्थी पंचमी, षष्ठी व सप्तमी यांच्या एकवचनी प्रत्ययात स्पष्ट दिसू लागते. तक्त्यांतील रमा व गोपा किंवा हरि व नदी, किंवा नदी व वातप्रमी यांचे भस्थानीय प्रत्यय पहा म्हणजे स्त्रीलिंगी व पुल्लिंगी भिन्न प्रत्यय संस्कृतात निर्माण झाल्याचा वास येऊ लागतो आणि ही भिन्नता कोणत्या रस्त्याने आली ते मति व धेनु आणि धी व भू या शब्दांच्या भस्थानीय प्रत्ययांवरून कळते. तक्त्यावरून दिसेल की, नदी व रमा नित्यस्त्रांप्रत्ययग्राही आहेत आणि हरिगुरु व वातप्रमीखलपू नित्यपुंप्रत्ययग्राही आहेत. या नित्यस्त्री व नित्यपुं शब्दांच्यामध्ये स्त्रीप्रत्यय व पुंप्रत्यय असे दोन्ही प्रत्यय घेणाऱ्या मतिधेनु व धीभू या जोड्या आहेत. मति शब्द एकदा पुल्लिंगी हरि शब्दाप्रमाणे चालतो आणि एकदा स्त्रीलिंगी नदी शब्दाप्रमाणे चालतो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries