संस्कृत भाषेचा उलगडा

नपुंसक शब्द हलन्त किंवा अजन्त असतात. अजन्त नपुंसक शब्द सर्व ऱ्हस्वान्त असतात. प्रथमेची व द्वितीयेची रूपे सारखी असतात आणि तृतीयेपासूनची पुढली सर्व रूपे पुल्लिंगी शब्दांच्याप्रमाणे असतात. कोठेही स्त्रीलिंगी शब्दांच्याप्रमाणे नसतात. तृतीयेपासून पुढे नपुंसकलिंगी शब्दांना ज्या अर्थी पुल्लिंगी प्रत्यय लागतात त्याअर्थी पुल्लिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द यांच्यात तृतीयाविभक्तीपासून पुढे काहीच अंतर नाही हे उघड झाले, पुल्लिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द यांच्यात अंतर काय ते प्रथमा व द्वितीया या दोन विभक्त्यांच्या रूपात आहे. आता नपुंसकलिंगाची प्रथमेची व द्वितीयेची रूपे ज्या अर्थी एकच आहेत, त्या अर्थी नपुंसकलिंगी शब्दांना एकच विभक्ती आहे, असे विधान करणे ओघास येते आणि ज्या शब्दांना मुळी एकच विभक्ती आहे त्यांना विभक्ती मुद्दलांतच नाही म्हटले तरी चालेल. मनस्, मनसी, मनासी अशी जी तीन रूपे मनस् शब्दाची होतात ती कर्ता, कर्म, अधिकरण, संप्रदान, वगैरे संबंध दाखवीत नाहीत, ती फक्त एक दोन व तीन या संख्या दाखवितात किंवा दाखवीत असे भूतकालीन क्रियापद योजिणे जास्त प्रशस्त. कारण, सध्या आपण ज्या प्रत्ययासंबंधाने विवेचन करण्याचा यत्न करणार आहो ते प्रत्यय ज्या पूर्ववैदिकभाषेत होते ती भाषा पूर्ववैदिकभाषा पैकी अत्यंत जुनाटातली जुनाट होती. त्या जुनाटातल्या जुनाट भाषेत फक्त वचनप्रत्यय होते, विभक्तीप्रत्यय नव्हते. अशा त्या जुनाटभाषा बोलणाऱ्या समाजाचा विभक्तीप्रत्यय ज्याच्या भाषेत निर्माण झाले होते अशा पूर्ववैदिक समाजाशी मिलाफ झाला. हा विभक्तीप्रत्यय योजिणारा समाज फक्त पुल्लिंगी बोले आणि विभक्तीप्रत्यय न योजिणारा समाज फक्त नपुसकलिंगी बोले. याचा अर्थ असा की या दोन्ही समाजात अद्याप लिंगभेद दाखविण्याकइतकी प्रगती झाली नव्हती. आपल्या अर्वाचीन पाणिनीय व वैदिक भाषेच्या दृष्टीने एक समाज पुल्लिंगी बोले व दुसरा समाज नपुंसकलिंगी बोले असे आपण म्हणतो, याचे कारण एवढेच की एका समाजाच्या शद्बरूपांना वेदकालीन वैय्याकरणांनी पुल्लिंगी रूपे म्हटले व दुसऱ्या समाजाच्या शब्दरूपांना नपुंसकलिंगी म्हटले. एका अत्यंत प्राचीन चमत्काराचे अर्वाचीन भाषेने आपण नामकरण करतो या पलीकडे या बोलण्यात जास्त मतलब नाही, असो. फक्त वचनप्रत्यय ज्यांच्या भाषेत निर्माण झाले त्यांची गाठ वचनप्रत्ययी शिवाय आणिक विभक्तीप्रत्यय ज्यांच्या भाषेत निर्माण झाले, परंतु लिंगभेद ज्यांच्या भाषेत अद्याप निर्माण झाला नव्हता, अशा समाजाशी पडून, संमिश्र भाषा निर्माण झाली, या संमिश्र भाषेत दोन प्रकारचे वचनांचे प्रत्यय ज्यांना लागतात असे दोन प्रकारचे शब्द मिसळले आणि ही मिसळ होत असताना पुल्लिंगी शब्द व नपुंसकलिंगी शब्द असा भेद शब्दप्रांतांत शब्दांचा विचार करणाऱ्यांना दिसू लागला. अत्यंत जुनाटांतल्या जुनाट समाजात भाषेचा व शब्दांचा विचार करणारे लोक होते असे जे विधान वरील वाक्यात केले आहे त्या संबंधाने आचंबा वाटण्याचे कारण नाही. आपण जे शब्द बोलतो त्या शब्दांचा विचार करण्याची सवय अत्यंत रानटी मनुष्यातही आढळून येते आणि शब्दांवरती कोट्या लढविलेल्या आढळात येतात. विभक्तीवाले व केवळ वचनवाले असे जे दोन समाज एकवटले त्या एकाभूत समाजात वचनवाल्याच्या मनस्, मनसी व मनांसी या तीन रूपांना विभक्तीवाल्यांनी प्रथमा हे नाव दिले आणि नंतर मनस् हा शब्द आपल्या धर्तीने चालवून त्याच्या आठी विभक्त्या साधून घेतल्या. एका गोधडीचे ठिगळ दुसऱ्या गोधडीला लाविले. विभक्तीवाल्यांच्या शब्दरूपांचे २१ कलमापर्यंत जे पृथक्कारण केले त्यावरून असे दिसून आले की, प्रथमेच्या एकवचन, द्विवचन व त्रिवचन यांच्यावर बाकीच्या विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमे केलेली आहेत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries