मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

साता-यास ताराबाई पुण्याहून गेल्यावर सर्व कारभार प्रधान पंत यांचे आज्ञेप्रमाणें गोविंदराव चिटणीस व यशवंतराव खासनीस व देवराव लपाटे करू लागले. आपलें कांही चालत नाहीं असे तिचें मनांत येऊन, दोन्ही राण्या आपल्याबरोबर घेऊन, रुसून किल्ल्यावर जाऊन राहून, किल्ला बळकाविला. तिजला समजावून आणावयाकरितां स्वत: रामराजे बापूजी खंडेराव यांचे कांही लोक बरोबर घेऊन मार्गशीर्ष शु॥ ५ रोजी (२३ नोव्हेंबर १७५०) किल्ल्यावर गेले. तेव्हां ताराबाईनीं त्यांस स्वतंत्र वागण्याविषयीं बहुत उपदेश केला. परंतु तें सांगणें महाराजांनी मान्य केले नाहीं. तसे परत साता-यास आले. नंतर दुसरे दिवशी चंपाषष्ठीचे (२४ नोव्हेंबर १७५०) निमित्तानें ताराबाईनें किल्ल्यावर भोजनास बोलाविले. तेव्हां महाराज किल्ल्यावर जातांच तेथें कैद केले व किल्ल्याचे कामगार हवालदार वगैरे यांस आज्ञा केली कीं, बरोबर आलेल्या लोकांस बंदुकांचा मार करून घालवून द्या. पुढें ताराबाईनीं दमाजी गायकवाड यास पत्र पाठविलें कीं, मराठयांचे राज्य ब्राह्मणांचे हातीं लागलें तें सोडण्याविषयीं तुह्मीं यावें. त्याप्रमाणें त्यांनी मान्य करून येण्याची तयारी केली. सातारे शहरांत कोकणस्थ ब्राह्मणांचे पक्षपाती जे लोक असतील त्यांचे घरावर तोफांचा मारा चालेल असें करून ठेवावें, अशी किल्ल्याचे कामगार यास आज्ञा दिली. ही गोष्ट नाना पुरंदरे वगैरे पेशवे यांजकडील अधिकारी यांस कळली; परंतु ते समजले कीं ही ह्मातारी वेडी आहे. ह्मणून उगीच बसले. ताराबाईनीं किल्ला बळकावून महाराजांस कैद केल्याची व गायकवाड येण्याची खबर पेशवे यांस पुण्यास लागली. तेव्हा यानीं त्र्यंबकराव सदाशिव पुरंदरे यास किल्ल्यासभोवतीं चौक्या बसवून, किल्ल्यावर धान्य वगैरे सामान न जाईल असा बंदोबस्त करण्याविषयी आज्ञा देऊन, दमाजी गायकवाड येत आहे त्याचे बंदोबस्ताकरितां बळवंत गणपत मेहेंदळे व बापूजी बाजीराव रेटरेकर यांस नेमून, पांच हजार फौज त्यांजबरोबर ठेविली. पुरंदरे यांची फौज किल्ल्यासभोवतीं मोर्चेबंदी करून मार्गशीर्ष तागायत फाल्गुनमासापर्यंत होती. व॥ ६ पर्यंत याप्रमाणें बंदोबस्त ठेविला होता. दमाजी गायकवाड यानें खानदेशांत दंगा मांडला होता. त्याजवर वर लिहिलेले दोन सरदार फौजेनिशी रवाना केले. त्याशीं लढाई झाली. पेशवे यांजकडील फौजेचा मोड झाला. जेजुरी मोरगांवपर्यंत आला. दरम्यान पुण्यावर येणार होता. लोक गलबलून पळू लागले. तेसमयीं बाबा फडणीस व महादाजी अंबाजी पुरंदरे यांनी त्यास चिठी पाठविली त्यावरून पुण्यावर न येतां परभारा गेला. दमाजी गायकवाड यानें पेशवे यांजकडील फौजेचा मोड केल्याची खबर साता-यास नाना पुरंदरे यास कळतांच त्यानें सर्व फौज घेऊन नाझ-यास जेजुरीनजीक मेहेंदळे रेटरेकर यास येऊन मिळाले. त्यास दिल देऊन सर्व लोकांचे समाधान करून सर्व फौज एके ठिकाणी जमवून गायकवाडाचे पाठीमागें लागले. त्या वेळेस गायकवाड साता-यानजीक वेण्येचे काठी व-यावर उतरला होता. पुरंदरे यानी फौज घेऊन एकंदर वडूथावरून गायकवाड याजवर गेले. लढाई झाली. गायकवाड याचा मोड होऊन गेंड्याचे माळावरून सातारा शहरांत घालविला. लष्कराचे डेरे दांडे सर्व लुटून आणिले. निशाणें व नौबत बापू व बळवंतराव यांची गायकवाड यांनी नेली होती ती माघारी आणिली. गायकवाड लुटून फस्त केला. हें वर्तमान छ माहे जमादिलावर रोजी झालें. हिकडे श्रीमंत पुण्यास असतां निजामउन्मुलूख याचा दुसरा पुत्र नासरजंग यानें राज्याचा अधिकार चालविला होता. तो कर्नाटकांत फौजेसहित गेला होता. गाजुद्दीन, निजामाचा वडील पुत्र, यानें मल्हारराव होळकर यांचे विद्यमानें पेशवे यास बोलणे लाविलें कीं, निजामपदवी आपल्यास मिळावी, या गोष्टीस आपण साह्य व्हावें. ही गोष्ट पेशवे यांनी मान्य करून दिल्लीस पत्र पाठवून औरंगाबादेकडे जाण्याची तयारी केली.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries