मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ इसन्ने खमसैन मया व अलफ, सन ११६१ फसली,
अवलसाल छ १० रज्जब, २५ मे १७५१,
ज्येष्ठ शु॥ ११ शके १६७३ प्रजापति संवत्सरे.

पेशवे गाजुदिनाचे कामाकरितां मोंगलाकडेस स्वारीस पुण्याहून छ २४ जिलकाद रोजी (४ अक्टोबर १७५१) निघून, छ २६ पर्यंत भांबर्डे येथे मुक्काम करून, पुढें छ १ जिल्हेज (१० अक्टोबर १७५१) वडगावास जाऊन, पुढे घोडनदीकडे चालते झाले. पेशवे आपल्यावर येतात बातमी सलाबतजंग यास कळल्यावर त्यानेंही फरासिसांची पलटणें साह्यास घेऊन एकदम कोरेगांवावर आला. पेशवे फौजेसुध्दां त्याचे पाठी लागले. छ १९ मोहरम रोजी (२७ नोव्हेंबर १७५१) घोडनदीवर लढाई झाली. छ १ सफर रोजी (९ डिसेंबर १७५१) तुळापुरास येऊन पुन: माघारे उलटून मांडवगण वगैरे ठिकाणी लढाया झाल्या त्यांत कोन्हेर त्रिंबक एकबोटे यानें मोठा पराक्रम केला. मराठे जय पावले. याच लढाईत बाबूराव फडणीसास तोफेचा गोळा लागला होता. छ २४ मोहरम रोजी (२ डिसेंबर १७५१) त्र्यंबक किल्ला सर झाल्याची खबर आली. छ ३० सफर रोजी (७ जानेवारी १७५२) उभयपक्षी सल्ला होऊन सलाबतजंग याजकडील नानरोटी व दिवाण रामदासपंत याजकडील तुळशी ठेवून सिंगवे परगणें राहुरी मुक्कामी सल्ला होऊन लढाई तहकूब झाली. रामदासपंत यास किताब राजा रघुनाथ ह्मणून होता. नबाबाचे लष्करांत कांही तंटा उत्पन्न झाला यांत तारीख ७ एप्रिल सन १७५२ रोजीं मारला गेला. त्याची दिवाणगिरी शहानवाजखान ऊर्फ सरलष्कर खान यास दिली होती. याचा पुत्र समशुदौला यास मुसाभुशी यांणी मारल्यावर विठ्ठल सुंदर दिवाण झाले. रामचंद्र मल्हार याणी लोकांवर कर्जपट्टी घातली होती. त्याणी थोडे दिवस तीन वर्षेपर्यंत कारभार करून पुण्यांत गणपतीच्या मागें त्यांचा वाडा होता तेथें मयत झाले. सदाशिव रामचंद्र पुत्र यास नवी सरदारी दिली, छ १२ जिल्हेज (२० आक्टोबर १७५२). खंडेराव व सयाजी गायकवाड यास कैदेतून सोडून बहुमानाची वस्त्रें दिली. दमाजी लोहोगडावर व जयसिंग यास कोरीगडावर कैदेंत ठेविलें होतें, व उमाबाई दाभाडी सिंहगडास ठेविली होती. पुढें तिजला सोडिलें. ती चरवलीस श्रीमंतांस भेटली. जयसिंग गायकवाड यास विठ्ठल शिवदेव याजबरोबर गुजराथची ठाणी खाली करून घ्यावयाविषयीं पाठविण्याचा विचार होता. परंतु जो जयसिंग कोरीगडावर कैदेतच मयत झाला. यशवंतराव दाभाडे यास पुण्यास कैदेत ठेविले होते. पुढे शरण आल्यावरून त्यास सोडून तळेगावास पाठविले होते. परंतु तो फार बेहोश. गुजराथचा अम्मल उठवावा ह्मणून दादासाहेब यांस चंद्र १० ते १३ जिल्हेज रोजी (२२ आक्टोबर १७५१) स्वारीस पाठविले. सोनगड वगैरे प्रांती स्वारी झाली. छ १६ रबिलाखर (२१ फेब्रुवारी १७५२) पारनेरा किल्ला घेतल्याची खबर आली. पुढें दमाजीनें एकनिष्ठपणें वागावें असें कबूल करून घेऊन त्यास मोकळा करून छ २० रबिलाखर रोजी (२५ फेब्रुवारी १७५२) गुजराथेंत दादासाहेब यांजकडे पाठविलें. छ ४ जमादिलाखर रोजी (८ एप्रिल १७५२) आहद सोनगड तहद सिंधुसागर गुजराथप्रांत देखील जकात निम्मे अम्मल पेशवे निम्मे दाभाडयाबद्दल गायकवाड याजकडे, याप्रमाणें वांटण्या झाल्या. छ १० रबिलाखर (१५ फेब्रुवारी १७५२) श्रीमंत माधवराव बल्लाळ यांची मुंज पुण्यास त्र्यंबकराव मामा यांनी लाविली. छ १२ जमादिलावल (१८ मार्च १७५२) भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर यांजला करून श्रीमंत पुण्यास आले. याच दिवशीं दिल्लीबादशहाकडून फरमान आले होते, चैत्र शु॥ १५ (१८ मार्च १७५२). महादाजी अंबाजी घरी बसून होते, त्यांस सरदारी दिली व पुत्र नीळकंठराव पुरंदरे यास पुणे सुभा सांगितला. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries