मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

छ ९ जमादिलावल रोजीं मल्हारजी होळकर व मीर शाबुद्दीन गाजुद्दीनखान यांची भेट झाली, फाल्गुन शुध्द १० सोमवार (४ मार्च १७५४). छ ११ जमादिलावल रोजी (६ मार्च १७५४) बादशहा दिल्ली यांजकडून दादासाहेब यांस वस्त्रें आली. छ ८ जिल्हेज, आश्विन शुध्द १० रविवार रोजी (६ आक्टोबर १७५३) श्रीमंत नानासाहेब यांची स्वारी मुहूर्तानें पर्वती वानवडीकडे वगैरे पुण्यालगतच फिरून छ ३० मोहरम रोजी (२६ नोव्हेंबर १७५३) परत आले. श्रीमंत माधवराव बल्लाळ यांचे लग्न छ १३ सफर, मार्गशीर्ष शुध्द १४ रविवार रोजी (९ डिसेंबर १७५३) पुण्यास जालें. शिवाजी बल्लाळ जोशी सोलापूरकर यांची कन्या रमाबाई. याच महिन्यांत अल्लीबहादूर यांचें लग्न झाले. हा लग्नसमारंभ झाल्यावर श्रीमंत कर्नाटकचे स्वारीस गेले, जमादिलावल महिन्यांत (फेब्रुवारी-मार्च १७५४). हरिहर व अंभी व बागलकोटवर लढाई झाली; व जमादिलाखरांत मुंडलगीवर लढाई झाली; व रजब महिन्यांत (मे १७५४) मिरजेस मोर्चे लावून छ १७ रोजीं (११ मे १७५४) स्वारी पुण्यास परत आली. या स्वारीत जमखिंडी व तेरदाळ हे महाल पेशव्यांनी घेतले. छ १८ जिल्हेज (१६ अक्टोबर १७५३) रामाजी महादेव नामजाद यांजकडून किल्ले पालव फत्ते झाल्याचें वर्तमान आलें. छ ३ रबिलावल (२९ डिसेंबर १७५३) व छ ११ सबान (३ जून १७५४) यमाजी शिवदेव यांनी महिपतगड घेतल्याचें वर्तमान आले. छ २९ जमादिलावल (२४ मार्च १७५४) भगवंतराव त्रिंबक यांजकडे खासे नगारा व निशाण दिलें. छ ८ जमादिलाखर (२ एप्रिल १७५४) कृष्णराव चासकर, काशीबाईचे बंधू, चैत्र शुध्द ९ सोमवार रोजी मयत झाले. छ १ रजब (२५ एप्रिल १७५४) त्रिंबकराव शिवदेव यास सरदारी दिली, वैशाख शुध्द ३ गुरुवार. छ ११ साबान (३ जून १७५४) जीवधन व निंबगिरीवर सरकारचें निशाण चढविले. जनार्दन बल्लाळ, बाबूरावराम फडणीस व कृष्णराव पारसनीस व अन्याबा मजमदार व महीपतराव चिटणीस व कोन्हेर त्रिंबक एकबोटे यांस पालखीची वस्त्रें आली. यशवंतराव दाभाडे मयत झाले. दमाजी गायकवाड यांजकडे ऐवज करार, ब॥ मु॥ ५२५००० नजर नानासाहेब, २५००० भाऊसाहेब, २५००० गोपिकाबाई, २५००० रामचंद्रबाबा, एकूण ६२५००० ठरले. अमृतराव कवी विसा मोरो अवरंगाबादकर यांचे घरी असत ते वारले. कल्याणप्रांत पूर्वी सरकारांत आला होता. या साली आंग्रे याजकडून त्यांजकडे निम्मे होता तो आला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries