मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१३७]                                                                    श्री.                                                          २३ सप्टेंबर १७५५.  

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना त॥ आश्विन वद्य ३० पावेतों स्वामीचे कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान एक दोन पत्रीं सेवेसी लिहिलें आहे त्याजवरून विदित जालेच असेल व चिरंजीव बाबूराव याणें विनंति केलीच आहे. रा. गोपाळराऊ याजविशीं आज्ञापत्र सादर जाले. त्यास राजश्री दादास्वामीचें आज्ञापत्र आले. त्यास आह्मास श्रीमंत रा. दादास्वामींनी आज्ञा केली ते प्रमाण गोपाळराऊ याजला राजी करतों. मीहि येथील बंदोबस्त करून येतो. इकडील नवा मुलुख. रा. जयाजी शिंदे यांस मारवाडकरांनी दगा केला. हें वर्तमान जमीनदारास कळताच मनमाने त्याप्रमाणे लबाडीस आले. सकुराबाद, इटावे याजकडे जमीदारांशीं झुंज मातबर आह्मासीं जालें. पंधरा सोळा घोडीं पडली. भले माणूस ठार जालें. स्वामीचे प्रतापे गवार मारून कहाडिले. परंतु हा मुलूख कोता. देशी गवार आहे. सभोवतें पठाण. जागा बिकट. रयत ह्मणावी तर रजपूत. हे गत आहे. आमचे तैनातीस फौज रा. अंताजी माणकेश्वर याजकडील देविली. त्यास त्याजला रा. दत्ताजी शिंदे याजकडे मारवाड प्रांत जाणें. तेथेहि जरूर गेली पाहिजे, जाणून निरोप दिल्हा. श्रीमंत रा. दादास्वामींनीं रसदेचा ऐवज चार लाख पासष्ट हजार त्याजला देविला. त्याप्रमाणें निकडीने त्याजला जाणें. सबब सत्वर भरून दिल्हा. चार लाख पासष्ट हजार याशिवाय नव्वद हजारांची वरात फफुंद व इटावे, सुकुराबाद ऐवजी तेहि दिल्ही. सालमजकूरची रसद सकुराबाद, इटावे, फफुंद येथील रसद भरून दिली. त्याची कबज सेवेसी पाठविली आहे. मी चाकर बारगीर स्वामीचा आहे. जे मेहनत कुराकडा येथें केली, जिवाकडे न पाहिले आणि मोगलाशी झुंजलो, स्वामीचे प्रतापें बोलबाला जाला. सुभा मातब्बर होता. त्यास जागा सुटली. स्वामीचे घरी आली. जर जागा गोपाळराव यास देणें होती तर मजला बोलावून हजर नेऊन जे आज्ञा करणें ते करावी होती. मी हुकुमी स्वामीचा. आह्मास उजूर काय? परंतु कारागडेयांत माझी प्रतिष्ठा, आबरू स्वामींनींच वसविली. स्वामीचें जोराने वजीर, रजवाडे यांजला मी खातरेस आणीत नाहीं. त्यास अबरूने जालियास स्वामीचाच नक्ष राहतो. श्रीमंत राजश्री दादास्वामींची आज्ञा ते आह्मास प्राणादाखल आहे. त्यांचें आज्ञेत उजूर करीत नाही. मी त्यांचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करून पुणेयास येऊन श्रीमंत राजश्री दादास्वामीजवळ विनंती करणें ती करीन. आह्मी चाकर स्वामीचे कमाऊ आहे, स्वामीचे चार पैसे खराब करावयाचे नाहीं.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries