मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१३८]                                                                    श्रीशंकर.                                                       २७ आगष्ट १७५६.  

श्रीमंत राजश्री बाबूरावजीदादा स्वामींचे सेवेसी :-
पोष्य गोविंद बखले कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम स्वामीचे कृपेकरून भादो शुध्द २ पावेतों छत्रपुरीं सुखरूप असो. यानंतर श्रीमंत राजश्री पंत स्वामीकडून पत्रें आलीं, लाखोटे दोन. ते छत्रपुरीहून मुजरत अजुरदार काशिदाची जोडी करून स्वामीकडेस लाखोटे पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. बहुत जलदीनें श्रींमंतीं उत्तर आणविलें आहे. तर कृपा करून उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. पेशजी दोनदां मिळोन दोन जोडिया काशिदांच्या पाठविल्या आहेत. पत्रें तों स्वामीस पावलींच असतील. परंतु, उत्तर श्रीमंतास न आलें. अजुरदार पावले न पावले हें कांहींच कळत नाहीं. सविस्तर उठिलें पाहिजे. पुणेयाहून आपण रुपये देविले ते छत्रपुरीं येणेप्रमाणें आह्मी श्रीमंतांचे लिहिल्याप्रमाणें देऊन त्यांची पावलियाची कबजें घेऊन पाठविलीं आहेत.

७००० देणें सातप्पा चव्हाण व दादशेट दि॥ मोरशेट वीरकर, मित्ती श्रावण वदि २
२००० देणें बहिराप्पा गाढवे दि॥ वर्धप्पाशेट वीरकर श्रावण वदि २ संवत् १८१२.
-------
९०००

येणेप्रमाणें नवहजार रुपये उत्तम, पुराणे छत्रपुरी देऊन, कबजें घेऊन आपणाकडे पाठविलीं आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. श्रीमंतास लिहावें कीं, छत्रपुरीहून कबजें नवहजारांची पाठविली ते पावलीं ह्मणून जरूर जरूर श्रीमंताचे पत्रीं लिहिलें पाहिजे. वरकड वर्तमान सर्व श्रीमंतांचे पत्रावरून विदित होईल. पत्राचें उत्तर सत्वर पाठवून अजुरदारांची विदा केली पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ कीजे. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries