मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१३९]                                                                    श्री.                                                      

गोपाळराव यांणीं क-हाडीं गोपाळ विठ्ठल व शिवराम विठ्ठल पळसुले देसाई यांसी कुल यख्त्यारी सांगोन ठेविलें. त्यांचे हातें कारभार चालवीत. मुख्यत्वें धणीपणा गोपाळराव यांचा. गोपाळराव सातारियासी असतां श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांसहि कांहीं राजकारण कार्य पडल्यास त्यासहि छत्रपतींकडे व पंतप्रतिनिधीकडे उपयोगी पडोन महत्कार्य करीत. असें असतां प्रधानहि त्यांचे ठायीं कृपा करीत. पुढें स्वामी छत्रपती व रावप्रतिनिधी यांचा काल जाहाला, जगजीवन परशराम प्रतिनिधी करूं लागले. मुतालकी यमाजीपंत आण्णा करीत असतां आण्णा यांचें व गोपाळराव यांचें वांकडें आलें व वैकुंठवासी नानासाहेब यांच्याहि चित्तांत यमाजीपंत याशी तंबी पोंचवावी असें होतें. तेव्हां तें विना मुख्य प्रतिनिधी यांसी स्वस्थ ठेविल्याशिवाय सिद्दी न पावे. जाणून हें काम गोपाळराव यासी सांगितलें. त्याणीं याविषयींचा उपयोग करून किल्ले विशाळगड येथें संधान लावून तेथून वैकुंठवासी भवानराव यांसी आणिलें. जगजीवन परशुराम यासी किल्ले पुरंधरीं व यमाजी आण्णा यासी किल्ले कावनईवर जप्तींत ठेविलें. भवानराव यासी शके १६७० विभवनाम संवत्सरे, सन तिस्सा अर्बैनांत विशाळगडाहून आणून, त्यांस प्रतिनिधींची वस्त्रें देऊन आपण मुतालकी केली. त्यापासोन दीड दोन वर्षेंपर्यंत एकसानपणें यख्त्यारीनें कारभार चालविला. राज्य यथास्थित चालत असतां शके १६७२ प्रमोद संवत्सर, सन खमसैन, वैशाखमासीं गोपाळराव यांसी कोणी द्वेषबुध्दीनें वैरभावकापटय केलें. ते एकाएकीं सात प्रहरांत रात्रौ गतप्राण जाहले, त्यासमयीं अंतकाळीं आपलें कोणी जवळ नाहीं आणि आपण तर वांचत नाहीं, हें जाणून वे॥ नरसिंहभट लाटकर विश्वासूक समीप होते त्यांजपाशीं राव याणीं सांगितलें कीं आमची तर अवध पूर्ण जाहली. तुह्मी आमचे तीर्थरूप यांसी व पितृव्य व बंधू यांसी सांगावें कीं तुह्मीं युक्तीनें आपला संसार केल्यास जन्मजन्मान्तरीं पुरे असें मेळवून ठेविलें आहे, याजवर कालहरण करावें आणि नांवरूप रक्षावें, आह्मीं जीं कर्में उद्योग केले त्या कारभारांत तुह्मीं पडों नये, तुह्मास उरकणार नाहीं. याप्रमाणें भटजीपाशीं बोलोन देहविसर्जन जाहालें. उपरांत लाटकर यांणीं सांगितल्या अन्वयें वर्तमान तीर्थस्वरूप बाबाजी यांसी सांगितलें. पुढें बाबाजी कारभार करावयासी उदित जाहाले. ते वेळेस आमचे तीर्थस्वरूप देशमुख यांणीं बाबाजीस सांगितलें कीं चिरंजीव गोपाळराव यांणीं सांगितलें असतां तुह्मी यांत पडतां हें ठीक नाहीं, तुह्मीं यांत पडूं नका, हें तुह्मास उरकावयाचें नाहीं, दादा व भवानराव प्रतिनिधी एकच आणनावू आहेत, यांत आपण पडों नये, भवानराव मुतालकी हरकोणासहि सांगोत, पंतप्रतिनिधी यांचा दरबार थोर, घडीचें घडयाळ, विश्वास नाहीं, फिरावयासी उशीर नाहीं; पैक्यास मात्र खालीं याल हें ठीक नव्हे, चिरंजीवांचे सांगण्याप्रमाणें मानून चालावें हें उत्तम. असें अनेक प्रकारें सांगणें अलक्ष करून पुन: मुतालकीचा उद्योग आरंभिला. आपले पदरचा पैका तरी खर्च करूं नये हें सांगितलें तेंहि न ऐकिलें. मुतालकीचीं वस्त्रें घेऊन गेले, तेव्हां नानासाहेब वस्त्रें यास न देत. गोपाळराव यास जर पुत्र नाहीं तर त्यांचे बंधूस आणावें, त्यासी वस्त्रें देऊं, ह्मणून वस्त्रे तटविलीं. तेव्हां बाबांनींहि सांगितलें कीं बंधू केवळ लहान आणि तीर्थरूप दु:खेकरून केवळ विह्वळ; यास्तव नानासाहेबींहि सांगितलें कीं गोपाळराव यांचे पिते बंधू व तुह्मी एकत्र आहां त्यापक्षीं वस्त्रें तुह्मास देतो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries