मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

ह्मणून मग जगन्नाथपती वस्त्रें घेतलीं. नानासाहेब यांचे सांगणें जें वस्त्रें तुह्मास देतों, परंतु तुह्मीं गोपाळराव यांचे पिते, बंधू यांचे आज्ञेंत चालावें, त्यांस अंतर देऊं नये. याप्रमाणें जाहाले. पुढें कारभार करूं लागले. इतकियांत दादा प्रतिनिधी व यमाजीपंत बाहेर निघाले आणि फैलाव केला. त्यासमयीं भवानराव प्रतिनिधी यांसी जगन्नाथपंतीं आणून किल्ले वसंतगड येथें ठेविलें व आपलीं मुलेंमाणसें, सर्व वस्तवानी, हांडेंभांडें किल्यावर कागदपत्रसुध्दां ठेविलें, आणि आपण फौज धरून ठाणें वांगी येथे राहिलें. कऱ्हाडचें ठाणें गोपाळराव यांणीं मजबूद करून त्यात गोपाळ विठ्ठल मुलेंमाणसेंसुध्दां ठेविले होते. कऱ्हाडांतून बाबजी यांणीं लाख पाऊण लाख रुपये रोकड शिल्लक गोपाळराव यांची होती ते व घोडीपिंडीं सारी मत्ता वांगीचे ठाण्यांत नेली. आपण तेथें राहिलें. तेथें दादाप्रतिनिधी, ...यांची व त्यांची लढाई जाहाली. दाद यांणीं यास हतवीर्य करून जप्त केलें आणि फौज घेऊन कऱ्हाडास आले. ठाणे यासी वेढा दिल्हा. गोपाळ विठ्ठल यांचे वस्तू आंत टिकाव न निघे. तेव्हां गोपाळ विठ्ठल यांचे चुलते निळोपंत हे पंतप्रधान यांजकडे होते. त्यांणीं मध्यस्ती करून मुलेंमाणसें, हत्ती घोडीं ठाण्यांत होतीं तीं मुक्त करून ठाणें खाली करून दिल्हें. त्याणीं आपले मेहुणे मामा यांसी सुभा सांगितला. गोपाळ विठ्ठल यांची माणसें व तीर्थस्वरूप राजश्री मोरोपंत भाऊ, व त्र्यंबाजीपंतआप्पा, वगैरे सारे, हत्ती, घोडींसुध्दा अष्टेवाळवेयासी गेले, तेथे राहिले. दादा प्रतिनिधी कऱ्हाडाहून कोळयाचें ठाणें बापूजीबावा चिटणीस यांजकडे होतें त्यास वेढा देऊन बसले. समागमें जगन्नाथ कृष्ण कैदेंत होते. आमचे ती॥ कऱ्हाडींच होते. हे पहिलेंच दु:खपण करीत होते. हें वर्तमान दादा प्रतिनिधी यासी कर्णोपकर्णी कळोन केवळ त्यांचे वाटेस गेले नाहींत. कऱ्हाडाहून कोळ्यास जाऊन दादा प्रतिनिधी यासी भेटोन, दरबारखर्च करून सख्त भिडेनें जगन्नाथपंत यासी आपण जामीन राहून, सोडवून, आपले जिम्मेस करून घेऊन कोळयावरच होते. पेठ नेरळयावर गोविंदराव चिटणीस व थोरात फौज धरून होते. त्यांजवर दादाप्रतिनिधी चढाई करून गेले. चिटणीस व थोरात यांचा मोड जाहाला. अष्टेवाळवेयाचे ठाणें टाकून थोरात रात्रीं गेले. मोरोपंतभाऊ व गोपाळ विठ्ठल हत्ती, घोडींसुध्दां तेथून निघोन इंगळीस गेले. तेथें शामराव देशमूख यांणीं साहित्य करून आपल्या वाडयांत ठेविलें. तेथून पुढें सालवणास गेले. मागें भवानराव प्रतिनिधी व आपलीं मुलेंमाणसें वसंतगडीं विश्वासू तुकजी शेवाळे हवालदार व कारभारी आपले जमेचे चिटको रामचंद्र ठेविले होते. तेथेंच असतां कोणाचा आश्रय नाहीं; सबब ताराआऊसाहेब यांजकडे सूत्र केलें. आऊसाहेब यांनीं आपला भाचा कानोजी मोहिते यासी पाठविलें. त्यानें हवालदार व चिटको रामचंद्र यांसी जप्त करून किल्ला आपणच बळकाविला. भवानराव यांसी किल्लेयाजवरून उतरून मोहिते याणें सातारियासी पाठविलें. आऊसाहेब यांणीं भवानराव यांस दादाप्रतिनिधी याचे स्वाधीन केलें. आमचीं मुलेंमाणसें मोहिते याणें किल्यावर कैदेंत ठेविलीं. त्यांची सुटका न हो. तेव्हां आमचे तीर्थरूप महादाजीपंत सातारियासी आईसाहेबांकडून बोलणें करून, पांच सात हजार रुपये ऐन खंड, शिवाय दरबारखर्च करून, फक्त माणसें प्राण मात्र सोडवून घेतले. वरकड दौलत सारी मालमत्ता मोहिते याणें लुटोन घेतली. माणसें खालीं उतरलियावर, कुटुंब मातबर तेव्हां जशी ज्यास जिकडे सोय पडली तिकडे राहिले. जगन्नाथपंतीं मुतालकीं प्रमोद संवत्सर वैशाख मासापासून प्रजापतीसंवत्सर सन इसन्ने खमसेन पावेतों नऊ महिने केली.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries