मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

महाराज फारच कृपावंत झाले. पो। कडेरांजणगांव वगैरे पांच महालचे सरदेशमुखीचें वतन नानास दिल्हें. सैदही दक्षणेस येऊन सा सुभ्यांचा सुभा करीत होते. त्यास, कांहींका दिवशीं पातशहांनीं किलिजखान यास दक्षिणचा सुभा सांगून रवाना केलें. सैदाजवळ फौज व जंगी सामान पोक्त होतें. किलीजखान यांणीं दिल्लीहून निघाल्यावर फौज जमा करीत करीत आले. पातशहाची सैदावर अवकृपा आणि किलीजखान याजवर कृपा. तेण्हेकरून सैदास मोडून नेस्तनाबूद करून दक्षणचा सुभा करूं लागले. स्वदेशीं कितेक पुंड पाळेगारी करीत होते. त्यांचीं पारपत्यें नानांनीं केलीं. त्यास, प्रथम जाधवराव याजकडे जाऊन, तेथें बाबतीचा सुभा करून, तेथून श्रीमंत शाहूमहाराजांपासून सेनाकर्त मिळविलें. महाराजाची सेवा निष्ठेनें, करून, मर्द व शहाणे राज्यांत मनुष्य नाना ऐजा लौकिक वाढवून, महाराजाची कृपा संपादून प्रधानपद मेळविलें. जीवाभ्य श्रम करून, शत्रू पराभवातें पाववून, महाराजाच्या राज्याचा बंदोबस्त केला. त्याजवर, कांहींका दिवशीं नाना कैलासवासी जाहले. तेव्हां श्रीमंत बाजीराव साहेब व चिमाजीआप्पा सातारियास महाराजाचे दर्शनास गेले. रावसाहेबांस प्रधानपदाचीं वस्त्रें दिलीं. आपासाहेबांस दमाजी थोरात याचा सरंजाम सरकारांत घेतला त्याची सरदारी सरंजामासुध्दा देऊन वस्त्रे दिलीं. सातारियाहून पुण्यास आले. धनाजी जाधवराव याचे पुत्र चंद्रसेन जाधवराव सेनापती यांजवर महाराजाची अवकृपा झाली. याजमुळें ते मोगलाई नबाब किलीजखान असफजाहा याजकडे गेले. तेव्हां खंडेराव दाभाडे यास सेनापती व त्याचे पुत्र त्रिंबकराव दाभाडे यास सेनाखासखेल हीं दोन पदें महाराजांनीं कृपा करून दिल्हीं. त्याजवर कित्येका दिवशीं खंडेराव दाभाडे वारले तेव्हां सेनापती त्रिंबकराव दाभाडे यास दिल्ही. गुजराथ प्रांत त्याजकडे होता. त्रिंबकराव दाभाडे त्या प्रांतीं गेले होते. त्यास, रावसाहेब व आपासाहेब सातारियाहून आल्यावर दहा बारा हजार फौजेनिशीं गुजराथ प्रांतीं गेले. तेव्हां दाभाडे यांनीं बिघाडाची सुरत दाखविली. चाळीस हजार फौज त्यांजवळ होती. नबाब किलिजखान पन्नास साठ हजार फौज, बलाय तोफखाना, पायागडाकडे होते. ते समयीं वर घाटीं यावयास मार्ग न दिसे. इकडे दाभाडे व तिकडे नबाब. नाइलाज झाला. रावसाहेब व आपासाहेब यांजवळ थोडकी फौज, परंतु नामी नामी मर्द माणूस एकदिल, स्वामीकार्यास तत्पर, उभयतांनीं सर्व सरदार व लोकांचें मनोधारण करून, वडिलांचें पुण्य पदरीं व महाराजाचे एकनिष्ठ, तद्योगें लढाईचा कस्त करून, दाभाडयावर चालून जाऊन, युध्द करूं लागले. लढाई मातबार केली. ते समयीं त्रिंबकराव दाभाडे यास गोळी अंबारींत लागून कामास आले. फौजेवर हल्ला करून लुटून फस्त केली. मोठी फत्ते करून, पुण्यास येऊन राजदर्शनास गेले. दर्शन घेऊन पुण्यास आले. दसरा झाल्यावर रावसाहेब पुण्यास राहिले. आपासाहेब स्वारीची तयारी करून हिंदुस्थानांत स्वारीस जाऊन उज्जनीस दयाबहादूर सुभा होता त्याजवर जाऊन लढाई मातबर करून सुभा बुडविला. मुलूख सरकारांत घेतला. महाराजांच्या राज्याची अभिवृध्दी करीत चालले. मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे हे उभयतां सरदार सलाबतीचे दिवसेंदिवस आक्रम करीत चालिले. त्या स्वारीहून देशीं आल्यावर महाराजाचे दर्शनास गेले. त्यास शामळांनीं कोंकणांत उपद्व्याप करून तमाम किल्ले घेतले. त्याजवर मोहीम करावयाची मर्जी महाराजाची. परंतु जंजिरा समुद्रांत; हस्तगत होणें कठीण; व गडकिल्ले मजबूत. तेव्हां कांहीं फितूर असावा यास्तव शेखजी सुभेदार होता त्याजकडे राजकारण लाविलें. शेखजींचें व शिद्दी रसूल याकूबखान याचें चित्त शुध्द नव्हतें, याजमुळें फितूर करावयास जागा जहाली. राजपुरीस दाखल झाल्यावर पन्नास हजार रुपये त्यास द्यावे व जंजिरा घेऊन द्यावा आण पन्नास हजार रुपये घ्यावे, असा करार करून ठेविला. त्यास शिंद्दी रसूल याकूबखान वारले. ते समयीं त्यांचा थोरला पुत्र शिद्दी अबदल्ला जंजिरे यांत राहिला व धाकटा लेक शिद्दी अबदूल रहिमान मूर्दा दफन व्हावयास राजपुरीस आला. तेव्हां शिद्दीसंबूल, शिद्दीयाकूत, व शिद्दीआफवानी, व शिद्दीरहाण या चोघांनीं थोरले लेकास जिवें मारून जंजिरेयाचे दरवाजे देऊन किल्ला बळाविला, शिद्दीअबदूल रहिमान मुर्द्याबराबर आला तो राजपुरीस राहिला. त्या गर्दीसमयीं सेखजीचें पत्र श्रीमंत बाजीरावासाहेबास येतांच कुच करून मोठयामोठया मजली करून येकबेग राजपुरीस जाऊन दाखल झाले. जंजिरेयांत खबर पोचतांच शिद्दी रहाण लोकसुध्दां बाहेर आला. बाला ? राज्यावर लढाई होऊन शिद्दी रहाण पडला. रावसाहेबीं मोर्चे देऊन बसले. फत्तेसिंग भोसले व श्रीमंत राव प्रतिनिधीही होते. किल्ले कोट, अवचीतगड, सुरगड, बिरवाडी, तळाघोसाळा, कुरडू, महाड, रायगड घेतले. शिद्दी अबदूल रहिमान सापडला. तो रावसाहेबाजवळ होता. सा महिन्यांनीं तह करून शिद्दी अबदूल रहिमान यास जंजिरेयांत तक्तावर बसवून किल्ले घेतले. त्यांपैकीं रायगड व महाड हुजूर महाराजांनीं ठेवून वरकड किल्ल्यांचा बंदोबस्त रावसाहेब यांणीं केला. साडेपांच माहाल हबशास देऊन वरकड माहाल सरकारांत घेतले. तह करून पुण्यास येऊन महाराजांचे दर्शनास गेले. कान्होजी आंग्रे सरखेल कुलाबियास होते. ते वारलियावर त्यांचे वडील पुत्र शेखोजी आंग्रे दौलत कुलाबियास करीत होते. ते व धाकटे पुत्र संभाजी आंग्रे विजेदुर्गास होते. त्यास, शेखोजी आंग्रे वारले. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries