मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

तेव्हां संभाजी आंग्रे विजेदुर्गाहून कुलाबियास येऊन धोंडजी आंग्रे यास ठेऊन बंदोबस्त करून विजेदुर्गास गेले. संभाजी आंग्रे याचा व मानाजी आंग्रे याचा पेंच होता. याजमुळें संभाजी आंग्रे आले तेव्हां मानाजी आंग्रे पळोन रेवदंडयास फिरंगी याचे आश्रयास गेले. संभाजी आंग्रे विजेदुर्गाकडे गेल्यावर मानाजी आंग्रे कुलाबियास जाऊन किल्ला हस्तगत केला. तें वर्तमान संभाजी आंग्रे यांस कळतांच आरमारसुध्दां धाऊन आले. ते समयीं मानाजी आंग्रे यांचें पत्र येतांच राऊसाहेब व आपासाहेब थोर थोर मजला करून जाऊन पावले. मानाजी आंग्रे याची कुमक केली. ते समयीं राजमाची व कोथळा किल्ले दोन व बोरटी व छत्तिशी दो महाल, सरकारांत घेतले, आणि पुण्यास आले. यावर वसई साष्टीकडील भेद आला. यास्तव हशमी, मावळे व कोंकणचें लोक चाकरी ठेऊन खंडोजी माणकर व रामाजी महादेव यांस पाठविलें. ते जलद जाऊन कळव्याची खाडी उतरून जाऊन साष्टी घेतली. शंकराजी केशव यांस वसईस रवाना केले. ते गोखाव्याचे दादराजवळ जाऊन राहिले. त्यास, हें वर्तमान गोव्यास फिरंगी यास गेले. फिरंगी यांणीं तयारी केली. ती बातमी इंग्रजास मुंबईस आली. त्यांणीं पत्र बाजीरावसाहेबांस पाठविलें कीं तह करावा; नाहींतर फिरंगी येऊन साष्टी घेतो; मसलतीस खर्च केला तो व्यर्थ होऊन लोक मारले जातात. तेव्हां त्याचे उत्तर समर्पक पाठवून तेच वक्तीं मल्हारजी होळकर यास साष्टीस कुमकेस पाठविलें. ते जाऊन पावले तो फिरंगी जहाजें तयारी करून साष्टीस पावबुरजाजवळ आला. ते समयीं साष्टीवरून तोफाची मारगिरी केली. तेव्हां जहाजावर दोन किपीतान होते ते गोळयांनीं ठार पडिले. जहाजें निघोन गेलीं. कदाचित् फिरोन फिरंगी येईल याजकरितां गोव्यास पायबंद बसवावयाकरितां व्यंकटराव नारायण घोरपडे दहा हजार फौजेनिशी पाठविले. त्यांणीं जाऊन साष्टी बारदेस मारून मुलूख ताराज केला. त्याजवर आपासाहेब व राणोजी शिंदे वसई प्रांतीं जाऊन माहीम, शिरगाव, तारापूर घेतलें. ते समयीं बाजी भिवराव कामास आले. सदर्हू किल्ल्यांचा बंदोबस्त करून वसईस आले. मोर्चे किल्ल्यास देऊन सुरुंग खणून किल्ल्याचा भेद घेतला. त्या समयीं इराणी दिल्लीवर चढाई करून आला. ते समयीं पादशाहाचा फौजेविषयीं फरमाना आला. त्याजवरून बाजीरावसाहेब यांचें पत्र आपासाहेब यास गेलें कीं वसईस मोर्चे राहून दिल्लीचे स्वारीस जाऊन कार्य मातब्बर करावें, येविशीं महाराजांची आज्ञा जाहली आहे. त्यास वसईचा शह सोडावयाची मर्जी आपासाहेब यांची नाहीं ऐसें उत्तर जहालें. याजमुळें दिल्लीस जाणें न जहालें इराणी दिल्लीस येऊन दिल्ली लुटून खजीना घेऊन गेला. वसईचे मसलतीस मुबलख पैसा रावसाहेबीं पाठविला. वसई किल्ला जेर केला. गोव्याची कुमक न येई तेव्हां फिरंगी याणीं किल्ला देऊन गोव्यास जाऊन पुर्तकालास गेले. आपासाहेबीं वसईचा सुभा शंकराजी केशव यांसी व साष्टीचा सुभा खंडोजी माणकर यांसीं सांगोन आपण सरदार सुध्दां पुणियासी आले. वसईचे मसलतीस बारा चौदा हजार माणूस, स्वार व हशम, कामास आले. आपासाहेबी वसईचे मसलतीस भगीरथ प्रेत्न करून फिरंगाण प्रांत हस्तगत करून, धर्मराज्य हिंदुधर्माची स्थापना केली, दसरा जाहल्यावर फौज जमा करून, स्वारीची तयारी करून श्रीमंत रावसाहेब स्वारीस हिंदुस्थानांत गेले. आपासाहेब व श्रीमंत नानासाहेब पुण्यास राहिले. त्या वर्षी संभाजी आंग्रे फिरोन कुलाबियास आले. ते समयीं मानाजी आंग्रे याचें पत्र येतांच आपासाहेब व नानासाहेब दरमजल कुलाबियास गेले. तुळाजी आंग्रे संभाजी आंग्रे याबराबर होते. युध्दप्रसंग होतेसमयीं तुळाजी आंग्रे यांस धरून आणिलें. त्या स्वारीस मानाजी आंग्रे वजारत माब सरखेल यांजपासून पाली व मिरगड घेतले. बाजीराव साहेब नर्मदातीरास होते. तेथें कैलासवासी जालें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries