मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

तें वर्तमान कुलाबियास असतांच आले. तेथून पुण्यास येऊन श्रीमंत शाहूमहाराजाचे दर्शनास गेले. नानासाहेबास इहिदे अर्बैनांत प्रधानपदाचीं वस्त्रें महाराजांनी कृपा करून दिल्हीं. महाराजाची आज्ञा घेऊन पुण्यास आले. त्यास अंबाजीपंत पुरंधरे यांचे पुत्र महादोबा यांस आपासाहेबांनीं नानासाहेबांबरोबर देऊन हिंदुस्थानास रवाना केले. पिलाजी जाधवराव व मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व यशवंतराव ताकपीर व कित्येक सरदार समागमें होते. हिंदुस्थानांत जाऊन, शत्रूचीं पारपत्यें करून, त्या वर्षी छावणीस राहून, दुसरे वर्षी बंगाल्यास स्वारी करून, त्या प्रांतीं रघोजी भोसले सेनासाहेब सुभा होते त्यांची व श्रीमंतांची गांठ पडोन, युध्दप्रसंग होऊन, भोसले यांस लुटून, मोडून, बंगाल्यास खंडणी दरसाल करार करून फिरले. त्यास, आपासाहेब पुण्यास होते त्यांस वेथा होऊन कैलासवास केला. श्रीमंत भाऊसाहेब लहान होते. वासुदेव जोशी व रघुनाथराव हरी यांणीं बंदोबस्त केला. त्याजवर नानासाहेब स्वारीहून येऊन राजदर्शनास गेले. रघोजी भोसलेही आले. आठ महिने बखेडा पडला. तेव्हां महाराजांनीं नानासाहेबाची व भोसले याची समजावीस करून आज्ञा दिल्ही. पुण्यास आले. नबाब किलिजखान औरंगाबादेस होते ते वारले. त्यांचे पुत्र थोरले नाशरजंग करनाटकांत स्वारीस गेले. हिदायद मोहिदीखान, आदवानीचा सुभा, त्याशीं लढाई होऊन नाशरजंग व हिदायद मोहिदीनखान दोघेही पडले. तेव्हां सलाबतजंग किलीजखानाचे पुत्र बराबर होते. त्यास रामदासपंत दिवाण यांणीं सलाबतजंगास स्वारीहून भागानगरास आल्यावर रामदासपंतांनीं बिघाडाचा डौल धरून दरमजल आले. तेव्हां श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब बाहेर निघोन फौज जमा करून समीपता होऊन लढाई कुकडी नदीवर सुरू जाली. नबाबाजवळ फौज भारी, व तोफखाना व सुबासी फरासीस, जंगी सामान असतां श्रीमंतांनीं मराठे का यानें चौफेर फौज लढाई करीत होते. त्या समयांत त्रिंबक किल्ला त्रिंबक सूर्याजींनी कोळी लोक जमा करून, किल्ल्याचा भेद करून, रात्रीस जाऊन किल्ला फत्ते केला. तें वर्तमान रामदासपंतास कळतांच कोरोगांवाहून माघारे फिरोन गेले. तहरह सुरळीत न जाहला. श्रीमंत गंगातीरास होते. तेथून पुण्यास यावें. त्यास महाराजांनीं निमे गुजराथ श्रीमंतास दिल्हीं असतां अंमल बसला नव्हता. तो बसवावयाकरितां दादासाहेबाबराबर फौज देऊन गुजराथ प्रांतीं रवाना केलें. आणि नानासाहेब व भाऊसाहेब दरमजल पुण्यास आले. त्यास दमाजी गाईकवाड फौजसुध्दां पूर्वी दुर्बुध्दीनें आले. त्यांशीं लढाई होऊन धरून बेडी घालून कैदेस ठेविले होते. त्याजबरोबर फौज देऊन दादासाहेबाकडे गुजराथेस रवाना केलें. गुजराथेचे महाल निम्मे सरकारांत घेऊन निम्मे गायकवाडाकडे दिल्हे. आणि दमाजी गाइकवाड याची बेडी तोडून वस्त्रें दिलीं. सरकारांत महाल घेतलें. तेथें कमाविसदार पाठवून दादासाहेबीं कूच करून मजल दरमजल पुण्यास आलें. नबाब भागानगरास गेल्यावर रामदासपंत वारले. शाहानवाजखान दिवाण जाले. त्यास, मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे यांचे पुत्र जयाजी शिंदे हिंदुस्थानांत होते. त्याजकडून पातशाहास अर्ज करवून गाजुद्दीखानास सुभा सांगविला. त्यास, नबाब किलीजखान याचे थोरले पुत्र नाशरजंग त्या मागें गाजुद्दीखानांनीं सुभा करावा. किलीजखानांनीं गाजुद्दीखानास पातशाहाजवळ ठेविलें. त्याजमुळें इकडे सलाबतजंग दौलत करीत होते. त्यास, दक्षिणचा सुभा गाजुद्दीखानास सांगावा हेंच उचित पातशाहांनीं जाणून, व नानासाहेबही त्यास अनकूल त्याजवरून, गाजुद्दीखानास पातशाहानीं मेहेरबान होऊन सुभ्याची खिलत साबिलादस्तूर हत्ती, घोडे, जवाहीर, समशेर, शिक्केकटार रवाना केलें. मल्हारजी होळकर व जयाजी शिंदे गाजुदीखानास घेऊन आले. उभयतां सरदारांस माहीममरातीब दिल्हे. त्या वर्षी नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब आषाढ मासीं बाहेर पडोन फौज जमा करीत करीत चालिले. नवाब सलाबतजंग व निजामअल्लीखान व बसालतजंग व मीर मोगल भागानगराहून पुढें आले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries