मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

त्यांची यांची गांठ भालकीच्या मुक्कामीं पडोन लढाई सुरू होऊन नवाबास जेर केलें. तेव्हां खानदेश सुभा व नाशीक व पैठण वगैरे पन्नास लाखाचा मुलूख घेतला. गाजुदीखान अवरंगाबादेस आले. त्याणीं सा सुभे दक्षणचा सुभा करावा. त्यास निजामअल्लीखान याचे आईनीं विष घालून मारिलें. नबाब सलाबतजंग अवरंगाबादेस आले. रघुनाथपंत दादासाहेब यांस गुजराथ प्रांतीं अमदाबादेस रवाना केलें, आणि नानासाहेब व भाऊ यांणीं भालकीहून कुच करून, मजल दरमजल करनाटकांत जाऊन श्रीरंगपट्टण आदिकरून संस्थानिकांस जरब देऊन, खंडण्या करून, मातबर पैका मेळवून आगोटीस पुण्यास येऊन दाखल जाहले. दादासाहेब मजलदरमजल अमदाबादेस फौज सुध्दा जाऊन, तेथील बंदोबस्त करून, तिकडून स्वारी हिंदुस्थानांत करून, कुमाऊच्या पहाडापावेतों जाऊन, शत्रूचीं पारपत्यें करून, तिसरे वर्षी पुण्यास आले. करनाटकप्रांतीं संस्थानिक पाळेगार मवासगिरी करून होते. त्यांचीं स्थळें मजबूद. तोफांशिवाय जेर व्हावयाची नाहीं. याजकरितां तोफखाना व गाडदी नवी तरतूद करून, दरसाल करनाटकांत स्वाऱ्या करून सोंधे बिंदनर व सावनूर व श्रीरंगपट्टण व चित्रदुर्ग व हरपन्हळळी वगैरे संस्थाने यांस जरब देऊन खंडण्या मातबर आणिल्या. संस्थानिक शरणांगत जाहले. कर्नाटकचे पाळेगार कोणास रुजू झाले नव्हते ते श्रीमंतांनीं मोठया पराक्रमें पादाक्रांत करून महाराजांच्या राज्याची अभिवृध्दी करून महाराजांची कृपा विशेषात्कारें संपादून कीर्ती भूंडळीं केली त्यास शाहू महाराज व संभाजी महाराज या उभयतांसही पोटीं पुत्रसंतान नाहीं याजमुळें चिंता करीत होते. त्यास ताराबाईस पुत्र शिवाजीराजे व राजसबाईस संभाजीराजे हे दोघे पुत्र राजारामसाहेबाचे. त्यास, शिवाजीराजे यांस एक पुत्र रामराजे व कन्या दर्याबाई, दोवें जहालीं. त्यास संभाजी राजे यांची स्त्री जिजाबाई यांचे भयास्तव ताराबाईंनी लांबविला. तो कोणास न समजे अशा रीतीनें जागा जागा देशांतर करून काल हरणें होता. तो बारा चवदा वर्षांचा होऊन तुळजापुराजवळ पानगांवीं येऊन नारोजी भुत्याकडे होता. त्यास शाहूहाराजांस वेथा होऊन चारसा महिने वेथिस्त होते. त्या दिवसांत नारोजी भुत्या यास रांडपोर नव्हतें. शंभर रुपये कुणगा होता. आपलें म्हातारपण यास्तव त्या मुलांस अंतस्ते सांगितलें. तेव्हां त्या मुलानें आपलें अंतरंग सांगितलें कीं मी शिवाजी राजे यांचा पुत्र. तेव्हां त्या मुलाची हेटाळणी करूं लागला. त्यास शिवाजीराजे यांस दर्याबाई कन्या, पुत्र हा रामराजा, दोघें जाहलीं होतीं. त्यास पुकार होतां होता दर्याबाई निंबाळकरांचे घरी दिली होती तिजला बारशीस खबर गेली. तिनें माणसे पाठवून घरी नेऊन चौकशी करून ठेविलें. तें वर्तमान शाहूमहाराजांस व ताराबाईस कळलें. तेव्हां बातमीस नेहमी खंडेराव न्यायाधीश पाठविले. व नानासाहेबींही बातमीस कारकून पाठविले. त्याजवर शाहूमहाराजांनी शके १६७१ शुक्ल नामसंवत्सरी मार्गशीर्ष वद्य तृतीयेस कैलासवास केला. तेव्हां फौज पाठवून बारशीपानगावाहून राजारामास आणून, नानासाहेब आदिकरून सर्व सरकारकून व सरदार सामोरे जाऊन आणून, सुमुहूर्ते राज्याभिषेक करून, राज्यावर बसवून नजरा व मुजरे केले. तेच समयीं दोन लग्नें मोहित्यांच्या कन्या करून केली. त्याजवर संभाजीराजे यास गोत्रपुरुषाचा पुत्र दत्त देऊन, त्याचें नांव शिवाजीराजे ठेऊन, करवीरच्या राज्यावर बसवून संभाजीराजे यांची धाकटी स्त्री दुर्गाबाई व कारभारी राज्य चालवितात. नानासाहेबीं विश्वासराव यांजकडून प्रथम स्वारी मोंगलांवर करविली. दरमजल औरंगाबादेस गेले. तेव्हां सलाबतजंग व निजामअल्लीखान व बसालतजंग अवरंगाबादेस होते. त्यांशी युध्दप्रसंग दोन तीन महिने होत होता. त्यास, रामचंद्र जाधवराव दोन हजार फौजेनिशीं भालकीहून नबाबास सामील येत होते. त्यांची बातमी येतांच विश्वासरावसाहेबीं दत्ताजी शिंदे यास पांच सा हजार फौजेनिशी त्याजवर पाठविले. तेव्हा रामचंद्र जाधवराव सरकारचें ठाणें शिंदखेडचें होतें त्या ठाण्यांत शिरले. दत्ताजी शिंदे यांणी जाऊन त्या ठाण्यांत मोर्चे देऊन बसले. याजकरितां निजामअल्लीखान फौजसुध्दा जाधवराव यास सामील करून घ्यावयास चालिले. त्याच्या पाठीवर विश्वासरावसाहेब चालिले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries