मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१४३]                                                                    श्री.                                                       ११ नोव्हेंबर १७५९.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी जनार्दन फडणीस स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री कृष्णाजी महादेव यांजकडून दोन हजार माणोस स्वारीबराबर चाकरीस आणविलें आहे. तें घेऊन म॥रनिलें आले असिले तर उत्तम, नसिले तर म॥रनिलेस पत्र पाठविलें आहे तें त्याजकडे पाठवोन त्याचे लोक आणवावें. वरकडहि जागाजागाचे हशमी लोक पुण्यास आणविले होते ते आले न आले त्याचा समाचार घेऊन लोक आले नसतील त्यांस पत्रें पाठवोन जलदीनें लोक आणणें. तूर्त आळंदीची यात्रा भरत असेल, वाणीउदमी यात्रेस येत असतील, त्यांची रखवाली जाली पाहिजे. तरी कृष्णाजी महादेव याजकडील वगैरे जागाचे जे लोक जमा जाले असतील त्यांपैकीं दोनतीनशें माणोस आळंदीचे यात्रेचे रखवालीस पाठवोन देणें. पुण्यामध्यें चोऱ्या होतात ह्मणून कळलें, येविषयींचा तुह्मीं बंदोबस्त कसा कसा केला आहे? जागाजागा चौकीस माणसें ठेवून, हशमी लोक ठेवून चोरांचें पारपत्य करणें. चोरी न व्हे तें करणें. मुलकांत जागा जागा फासेपारधी व कैकाडी कोल्हाटी फिरतात. ते चोऱ्या करतात. तरी ताकीद करून फासेपारधी, कोल्हाटी वगैरे मुलकांतून काढून देणें; मुलकांत, पुण्यांस राहूं न देणें. जाणिजे. छ २१ रबिलोवल. बहुत काय लिहिणें हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries